
पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील महाड-पोलादपूर चेक नाक्यावर वनविभागाने धाडसी कारवाई करत बेकायदेशीर खैर लाकडाची तस्करी उघडकीस आणली आहे. वनरक्षक शालिनी कोहळे यांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून संशयित पिकअप गाडी पकडली असून, सुमारे ६१ हजार रुपये किमतीचा खैर माल जप्त केला आहे. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी महाड-पोलादपूर चेक नाक्यावर वनरक्षक श्रीमती शालिनी कोहळे या कर्तव्यावर असताना, त्यांना अशोका लिलॅण्ड पिकअप (क्र. MH-01-LA-8878) या गाडीचा संशय आला. त्यांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने गाडी न थांबवता वेगाने पळवून नेली. घटनेचे गांभीर्य ओळखून कोहळे यांनी तातडीने या गाडीचा पाठलाग केला आणि काही अंतरावर गाडी अडवून तिची झडती घेतली.
या झडतीमध्ये गाडीत ३.१५ घ.मी. खैर जातीचे लाकूड आढळून आले, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ६१,४२५/- रुपये इतकी आहे. वनविभागाने लाकडासह गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी देखील जप्त केली आहे.
या वनगुन्ह्यात सहभागी असलेले सुनील ज्ञानदेव मर्देकर (वय ४५, रा. ओझरे, ता. जावली), विठ्ठल रामचंद्र चव्हाण (वय ४७, रा. कामठी, ता. सातारा) आणि धनाजी संपत पवार (वय ५०, रा. वेळे, ता. सातारा) या तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले असून आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्यावर वनगुन्हा नोंद क्र. ०१/२०२६ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. अमोल सातपुते (भा.व.से.), सहाय्यक वनसंरक्षक श्री. प्रदीप रौंधळ आणि महाबळेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक शालिनी कोहळे यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाबळेश्वरचे वनपरिमंडळ अधिकारी श्री. सुनील लांडगे करत आहेत.
या कारवाईनंतर महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल म. ह. मोहिते यांनी नागरिकांना कडक इशारा दिला आहे. “वनहद्दीत विनापरवाना प्रवेश, अतिक्रमण, शिकार किंवा अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांवर वनविभाग कठोर कारवाई करेल. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्लास्टिक कचरा किंवा सांडपाणी वनक्षेत्रात टाकू नये. अशा कोणत्याही अवैध घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
























