पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यानिमित्त जलसंपदा विभाग व सातारा सिंचन मंडळाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी येथील सौ. मंदा सुरेंद्र पांगारे यांना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते ‘प्रगतिशील महिला शेतकरी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. जलव्यवस्थापन, आधुनिक शेती आणि ग्रामीण विकासातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव या निमित्ताने करण्यात आला.
शिक्षण केवळ बारावीपर्यंत झालेले असतानाही, सौ. मंदा पांगारे यांनी लग्नानंतर कौटुंबिक जबाबदारी पेलत असतानाच स्ट्रॉबेरी शेतीमध्ये पाऊल ठेवले. पारंपरिक शेती पद्धतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग राबवला. स्ट्रॉबेरी उत्पादनात सातत्य आणि आर्थिक नफा मिळवल्यानंतर त्यांनी थांबणे पसंत केले नाही, तर कृषी विभागाच्या सहकार्याने ‘मांडव शेती’ची संकल्पना आपल्या शेतात उतरवली. आज त्यांच्या शेतातून विषमुक्त, निरोगी आणि पौष्टिक भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात असून, या प्रयोगाने त्यांच्या कुटुंबाला एक मोठी आर्थिक उभारी मिळवून दिली आहे.
मंदा पांगारे यांचे कर्तृत्व केवळ स्वतःच्या शेतापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून गावातील महिलांना संघटित करून त्यांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला. विशेष म्हणजे, त्यांच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी गावाच्या विकासाचा कायापालट केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रयत्नांमुळे पांगारी गावाला आज ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून ओळखले जाते. निर्मळ, स्वच्छ आणि तंटामुक्त गाव घडवण्यासाठी त्यांनी महिलांना शेती व ग्रामविकासात सक्रिय सहभागी करून घेतले.
सातारा येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मंदा पांगारे यांच्या जिद्दीचे विशेष कौतुक केले. त्यांच्या जलव्यवस्थापनातील कल्पकता आणि सेंद्रिय शेतीमधील प्रयोगांची दखल कोयना बांधकाम विभाग व सातारा सिंचन मंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनीही घेतली आहे.
या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी त्यांचे पती सुरेंद्र पांगारे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेती क्षेत्रातील अथक कष्ट आणि पाण्याचे सुयोग्य नियोजन यामुळे मिळालेला हा पुरस्कार पांगारी गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. “भविष्यातही सेंद्रिय शेतीचा हा वारसा असाच पुढे सुरू ठेवणार असून, अधिकाधिक महिलांनी आधुनिक शेतीकडे वळावे,” असा मानस सौ. पांगारे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. या पुरस्काराबद्दल सौ पांगारे यांचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रनशेठ राजपुरे, सभापती शकुंतला चोरमले, सदस्य वंदना भिलारे, माजी सभापती रुपाली ताई राजपुरे, जावली बँकेचे संचालक अजित कळंबे, जिल्हा नियोजन कमिटी सदस्य प्रवीण भिलारे, रमेश चोरमले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवराणी अभिनंदन केले आहे.
























