पांचगणी न्यूज नेटवर्क
कुडाळ : जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर एखादी व्यक्ती आभाळालाही गवसणी घालू शकते, हे जावली तालुक्यातील म्हसवे गावच्या सुनबाई सौ. पूजा प्रथमेश शिर्के यांनी सिद्ध करून दाखवले आहे. घरची जबाबदारी आणि तीन वर्षांच्या लहान बाळाचे संगोपन सांभाळत पूजा यांनी ‘पुणे शहर पोलीस कॉन्स्टेबल’ पदी झेप घेतली आहे. माजी सरपंच स्वर्गीय रवींद्र साहेबराव शिर्के यांच्या त्या सुनबाई असून, त्यांच्या या यशाने म्हसवे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पूजा शिर्के यांचा शैक्षणिक प्रवास फलटण तालुक्यातील गायकवाडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतून सुरू झाला. त्यानंतर लोणंदच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक आणि फलटणच्या वाय. सी. कॉलेजमध्ये त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. माहेरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. लग्नानंतर सासरी आल्यावर त्यांच्यातील ही ध्येयवेडी जिद्द ओळखून पती प्रथमेश शिर्के यांनी त्यांना पूर्ण पाठबळ दिले. पाचवड येथील शहीद भगतसिंग अकॅडमीमध्ये त्यांनी पोलीस भरतीचे खडतर प्रशिक्षण घेतले. विशेष म्हणजे, पूजा या एक उत्कृष्ट धावपटू असून त्यांनी ‘वाई मॅरेथॉन’मध्ये विजेतेपदही मिळवलेले आहे.
पूजा यांच्या या यशाचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. त्यांना ‘पार्थ’ नावाचा तीन वर्षांचा लहान मुलगा आहे. तो अगदी लहान असताना त्याला घरी सोडून पहाटे पाचवडला सरावासाठी जाणे हे एका माऊलीसाठी मानसिकदृष्ट्या कठीण होते. मात्र, खाकी वर्दी परिधान करून समाजाची सेवा करण्याचे स्वप्न आणि पतीचे प्रोत्साहन यामुळे त्यांनी या आव्हानावर मात केली. आज त्यांच्या या मेहनतीचे फळ मिळाले असून एका कष्टकरी कुटुंबातील सुून राज्याच्या पोलीस दलात दाखल झाल्याने ग्रामस्थ मंडळ म्हसवे, विराट कला क्रीडा मंडळ आणि मंडळ यांच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे.
लहानग्या पार्थला घरी ठेवून मैदानावर घाम गाळला; जिद्दीची नवी कहाणी
पूजा शिर्के यांनी मिळवलेले यश हे केवळ एका पदाची निवड नसून ती एका माऊलीच्या संघर्षाची गाथा आहे. त्यांचा मुलगा पार्थ हा अवघा तीन वर्षांचा असताना पूजा यांनी पाचवड येथील अकॅडमी गाठली. लहान मुलाची जबाबदारी, घरातील कामे आणि पोलीस भरतीचा अत्यंत कठीण मैदानी सराव असा त्रिपुटी संगम त्यांनी साधला. बाळ लहान असल्याने अनेकदा मनाची घालमेल होत असतानाही त्यांनी सरावात कधीही खंड पडू दिला नाही. लग्नानंतर आणि आई झाल्यानंतरही स्वप्ने पूर्ण करता येतात, हा मोठा संदेश पूजा यांनी आपल्या कृतीतून समाजाला दिला आहे. त्यांची ही यशोगाथा आज अनेक ग्रामीण महिलांसाठी दीपस्तंभ ठरणार आहे.

























