पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी :निसर्गरम्य महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आदिवासी पाडा, धामुनसेवाडी (कासवंड) येथे श्री काळभैरवनाथ आणि ग्रामदैवत श्री काळेश्वरी देवीची वार्षिक महापूजा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. चैत्र कृष्ण पंचमीच्या मुहूर्तावर आयोजित या सोहळ्यासाठी कासवंड-धामुनसेवाडी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री काळभैरवनाथ आणि काळेश्वरी मूळ देवस्थान (मखाळी) येथील देवांच्या या वार्षिक उत्सवा निमित्त संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७:१५ वाजता विधिवत अभिषेकाने झाली. त्यानंतर दुपारी १२:१५ वाजता ग्रामदैवतांची मुख्य महापूजा करण्यात आली. या महापूजेचे मानकरी म्हणून सौ. जयश्री व श्री. दत्तात्रय सदाशिव धामुनसे यांनी धार्मिक विधी पूर्ण केले. दुपारी आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉ कार्यक्रमात काळेश्वरी देवीच्या सुवासिनींसाठी अक्षदा साडी आणि वाई येथील श्री. आनंद चोरगे यांच्या वतीने मानाची पैठणी साडी देण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील सुवासिनींच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली होती.
या सोहळ्याचे खास आकर्षण ठरलेला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ दुपारी संपन्न झाला. यामध्ये गावातील अनुभवी आणि प्रतिष्ठित अशा अनेक ज्येष्ठ व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि आदिवासी पाडा धामुनसेवाडीचे भाग्यविधाते मा. श्री. राजेंद्रशेठ राजपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना राजेंद्रशेठ राजपुरे म्हणाले की, “ग्रामदैवतांची ही परंपरा केवळ धार्मिक विधी नसून आपल्या संस्कृतीचा आणि एकतेचा कणा आहे. कासवंड आणि धामुनसेवाडी सारख्या दुर्गम भागातही ग्रामस्थांनी एकत्र येऊन ज्या पद्धतीने हा सोहळा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराचा उपक्रम राबवला आहे, तो कौतुकास्पद आहे. विकासकामांसोबतच आपल्या देवांची सेवा आणि ज्येष्ठांचा सन्मान करण्याची ही वृत्तीच समाजाला प्रगतीकडे घेऊन जाते.” दुर्गम भागातील जनतेच्या पाठीशी आपण सदैव खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
यावेळी व्यासपीठावर महाबळेश्वरच्या सभापती मा. सौ. शकुंतला चोरमले,पं.स. सदस्य सौ. वंदना भिलारे, युवानेते प्रविणशेठ भिलारे, वि.का.स. सेवा सोसायटी भिलारचे चेअरमन नितीन (दादा) भिलारे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत भिलारे, उद्योजक विवेकशेठ देसाई, आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेचे जिल्हाध्यक्ष सदाशिव रुईघरे, माजी पोलीस पाटील दत्तात्रय पवार आणि गुरुवर्य श्री. बाबुराव नारायण पवार (महाराज) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भैरवनाथ विकास मंडळ, जननीमाता मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ, नेहरू युवा मंडळ, सदगुरु कचरनाथ सेवा मंडळ तसेच नवयुवक मित्र मंडळ आणि दुर्गामाता महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. जननीमाता भजनी मंडळाच्या भजनाने वातावरण भक्तिमय झाले होते. सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण धामुनसेवाडी परिसर दुमदुमून गेला होता.
























