पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शहराच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली असून, निवडून आलेल्या नगराध्यक्षांसह १५ अपक्ष नगरसेवकांनी एकत्र येत ‘श्री घाटजाई शहर विकास आघाडी’ची स्थापना केली आहे. या नवनिर्वाचित १६ सदस्यांनी आज जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन आपल्या आघाडीची अधिकृत नोंदणी पूर्ण केली. या नोंदणीमुळे पाचगणी नगरपालिकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित घाटजाई शहर विकास आघाडीची सत्ता अधिकृतपणे प्रस्थापित झाली आहे.
आमदार मकरंद आबांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहराचा कायापालट करण्याचा निर्धार यावेळी सर्व सदस्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही प्रक्रिया पार पडताना राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकशाहीच्या प्रक्रियेनुसार, आघाडीची अधिकृत नोंदणी ही सत्तास्थापनेतील महत्त्वाची तांत्रिक बाब असून, यामुळे आता पालिकेच्या कामकाजाला कायदेशीर गती मिळणार आहे. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, आघाडीचे अध्यक्ष शेखर कासुर्डे आणि नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
आघाडीच्या नोंदणीनंतर खासदार नितीनकाका पाटील यांनी नवनिर्वाचित प्रतिनिधींशी संवाद साधला. पाचगणी हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने या शहराच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष आणि आघाडी अध्यक्षांनी शहराच्या प्रलंबित कामांसाठी मोठ्या निधीची मागणी केली असता, “तुम्ही शहराच्या शाश्वत विकासाचा ठोस आराखडा तयार करा, निधीसाठी मी आणि मकरंद आबा कुठेही कमी पडणार नाही,” अशी ग्वाही खासदार पाटील यांनी यावेळी दिली.
तत्पूर्वी, पाचगणी पालिका सभागृहात नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली. पाचगणीकरांनी मोठ्या विश्वासाने ही सत्ता हाती सोपवली असून, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे हेच आपले प्राथमिक ध्येय असल्याचे बगाडे यांनी स्पष्ट केले. सर्व सदस्यांनी ‘वज्रमूठ’ बांधून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र काम करण्याचा ठराव यावेळी संमत केला.
आघाडीचे अध्यक्ष शेखर कासुर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ना. मकरंद आबा पाटील आणि राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणीत एक स्थिर आणि पारदर्शक प्रशासन दिले जाईल. केवळ रस्ते किंवा पाणी नव्हे, तर तळागाळातील सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याला आमचे प्राधान्य असेल.
या आघाडीमध्ये नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, शेखर कासुर्डे, नरेंद्र बिरामने, प्रकाश गोळे, राजेंद्र पारठे, महेश खांडके, आकाश बगाडे, अमित कांबळे यांसह माधुरी कासुर्डे, परवीन मेमन, सुप्रिया माने, विमल भिलारे, राजश्री सणस, स्वाती कांबळे, अमृता गोळे आणि शिल्पा माने या महिला सदस्यांचाही समावेश असल्याने शहराच्या विकासात सर्वांगीण दृष्टिकोन दिसून येणार आहे.
























