पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : पर्यटननगरी पाचगणीच्या विकासकामांना गती देण्यासाठी पालिकेच्या तिजोरीत महसूल जमा असणे आवश्यक असल्याने, प्रशासनाने आता कर व भाडे थकबाकीदारांविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या थेट मार्गदर्शनाखाली शहरात राबवण्यात आलेल्या विशेष वसुली मोहिमेला मोठे यश मिळाले असून, अवघ्या काही दिवसांत पालिकेने तब्बल २ कोटी ७० लाख ३४ हजार रुपयांचा महसूल वसूल केला आहे. वारंवार सूचना देऊनही कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांवर आता जप्तीची टांगती तलवार असून, पालिकेच्या पथकाने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे.
शहरातील मालमत्ता धारकांकडे एकूण ४ कोटी २८ लाख ४३ हजार रुपयांची थकबाकी प्रलंबित होती. ही रक्कम वसूल करण्यासाठी पालिकेने ‘मोठी थकबाकी, आधी कारवाई’ हे धोरण स्वीकारले आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून दीर्घकाळापासून गाळे भाडे थकवणाऱ्या रेहाना लोहाना यांच्या मालमत्तेवर पालिकेने कायदेशीर बडगा उगारला. त्यांच्याकडे ८ लाख २८ हजार ७१८ रुपयांचे भाडे थकीत असल्याने, प्रशासनाने संबंधित गाळ्याला टाळे ठोकून जप्तीची प्रक्रिया पूर्ण केली. पालिकेच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अन्य मोठ्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. कार्यालयीन अधीक्षक प्रणव पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने थकबाकीदारांचा पाठपुरावा करून ही प्रभावी कामगिरी बजावली.
या मोहिमेत श्रेयस पत्की, प्रशांत सरोदे, स्वाती पाटील, अर्चना कचरे, जयंती गुजर, जगदीश बगाडे, संदीप बगाडे यांच्यासह जगदीश भगत, नासिर शेख, अशपाक पठाण, शशी मोहिते, अभिजीत शिंदे, तानाजी कासुर्डे, नितीन मर्ढेकर आणि प्रकाश हिरवे या कर्मचारी पथकाने सक्रिय सहभाग नोंदवला. केवळ मालमत्ता सील करणेच नव्हे, तर आगामी काळात थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करणे आणि मालमत्तांच्या लिलावासारखी कठोर पावले उचलण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. या मोहिमेमुळे पालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडली असून, जप्त केलेल्या मालमत्तांची यादी आता वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
पाचगणी पालिकेच्या वतीने शहरात राबवण्यात येणारी ही वसुली मोहीम केवळ तात्पुरती नसून, जोपर्यंत शंभर टक्के थकबाकी वसूल होत नाही, तोपर्यंत ती अधिक तीव्र केली जाणार आहे. यामध्ये निवासी व व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या थकबाकीदारांचा समावेश असून, कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
आपली भूमिका स्पष्ट करताना मुख्याधिकारी पंडित पाटील म्हणाले की, पालिकेचे उत्पन्न वाढवणे हे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनिवार्य आहे. नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आर्थिक पाठबळ आवश्यक असते, त्यामुळेच वारंवार विनंती करूनही प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई आम्हाला करावी लागत आहे. जप्तीची नामुष्की टाळण्यासाठी मालमत्ताधारकांनी स्वतःहून पुढे येऊन थकबाकीचा भरणा करावा आणि शहराच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
























