पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर: महाबळेश्वर तालुक्यातील एकमेव दुर्गम भाग असलेल्या कांदाटी विभागातील बी एस एन एल.सेवा गेली महिनाभरापासून कोलमडली असून ऐन पावसाळ्यात संपर्क सेवा बंद असल्याने लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही सेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी अन्यथा त्यांचे टॉवर काढून न्यावेत अशी मागणी शिंदी येथील सामाजिक कार्यकर्ते सौरभ मोरे यांनी विभागाच्या वतीने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम अशा कोयना, कांदाटी , सोळशी विभागात बी एस एन एल सेवा कोमात गेली आहे. याबाबत येथील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सेवा सुरळीत ठेवायची नसेल तर असून अडचण आणि नसून खोळंबा ठरणारी आपली सर्व यंत्रणा तातडीने हलवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
याबाबत कळमगांवचे सरपंच अनिल हिरवे यांनी सांगितले. आम्ही कोयनेचे राहणारे ग्रामस्थ पूर्वी आमच्याकडे फोन नव्हते त्यानंतर लोकांनी साधे फोन घेतले. नंतर लोकांना बाहुलं दाखवण्यासाठी बीएसएनएल ऑफिसने गावागावांमध्ये बुजगावणे असणारे टॉवर उभे केले. परंतु महिना महिना रेंज नसेल तर लोकांनी 500 रुपयाचे रिचार्ज मारून काय फायदा ? त्याच्यासाठी या विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन बीएसएनएल टॉवर बंद करावेत.
कोट्रोशी, कळमगाव, देवळी, झांजवड या गावांना कित्येक दिवस रेंज नाही पाऊस चालू झाला आहे कुठे काही दुर्घटना घडली तर लोकांनी कोणाशी संपर्क साधायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बी एस एन एल कंपनीने आपली यंत्रणा तातडीने चालू करावी अन्यथा ती बंद करावी अशी ही मागणी शेवटी सरपंच अनिल हिरवे यांनी केली आहे.
मुसळधार पावसात ही सेवा बंद पडल्याने दुर्गम भागातील जनतेला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लोकप्रतिनिधींनी वरिष्ठ पातळीवरून याचा कायमचा छडा लावावा अशी मागणी या या विभागातील नागरिकांनी केली आहे.
























