पाचगणी न्यूज नेटवर्क
नवी मुंबई/महाबळेश्वर : महाबळेश्वर आणि जावली तालुक्यातील मूळ रहिवासी जे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल विभागात स्थायिक झाले आहेत, त्यांच्या उन्नतीसाठी आणि विचारांच्या देवाण-घेवाणीसाठी ‘महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठान’च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि सभासदांची महत्त्वपूर्ण वैचारिक बैठक वाशी, नवी मुंबई येथील कांदा बटाटा मार्केटमध्ये नुकतीच संपन्न झाली.
आमशी गावचे ज्येष्ठ नागरिक आणि प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्रीरंग मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या बैठकीत महाबळेश्वर-जावली तालुक्यातील प्रत्येक गावातील विकासकामांसंदर्भात सखोल विचार विनिमय करण्यात आला.
प्रतिष्ठानने आजवर राबवलेले सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सहकारी, कृषी, अध्यात्मिक तसेच इतर विविध विधायक उपक्रम आणि कार्यक्रमांचा यावेळी आढावा घेण्यात आला. भविष्यात प्रतिष्ठानचे कार्य अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यावर उपस्थितांनी सविस्तर चर्चा केली.
वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्याचे स्थानिक आमदार आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी आपापल्या गावांमध्ये केलेल्या विकासकामांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. या विकास कामांच्या अनुषंगाने, महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि सभासदांनी मकरंद आबा पाटील यांच्या पाठीशी ठामपणे पाठबळ देण्याचा निर्णय एकमताने निश्चित केला.
यावेळी बैठकीला उपस्थित असणाऱ्या प्रत्येक गावातील प्रतिनिधींनी आपापले महत्त्वपूर्ण विचार मांडले.
प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, सचिव रमेश संकपाळ सर, संघटक विष्णु शिंदे सर, सल्लागार गोविंदशेठ शिंदे, आनंदा सकपाळ, बापू कदम, संतोष कदम, राजू शिंदे, गोविंद भोसले आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
बैठकीच्या यशस्वी समाप्तीनंतर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजेंद्र मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपस्थितांसाठी चहापाणी व बैठक व्यवस्था नारायण शिंदे, संतोष संकपाळ, संजय मोरे आणि राजेश देसाई यांच्या सौजन्याने करण्यात आली होती. महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुंबईकर रहिवासी आपल्या मातीशी जोडले राहून विधायक कार्य करण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
























