पाचगणी न्यूज नेटवर्क
भोसे: जावळी तालुक्यातील घोटेघर परिसरात रानडुकरांच्या कळपाने हैदोस घातला असून, काल रात्री दोन तरुण शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरी पिकाचे आतोनात नुकसान केले. ऐन तोडणीला आलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाल्याने राजकुमार महाडिक आणि अक्षय रांजणे या शेतकऱ्यांचे सुमारे २ ते २.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी आता पूर्णपणे हतबल झाला असून, वनविभागाने तातडीने दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा राजकुमार महाडिक यांनी दिला आहे.
भिलार परिसरापासून जवळच असलेल्या घोटेघर गावात अलीकडे स्ट्रॉबेरी उत्पादनावर शेतकऱ्यांनी मोठा भर दिला आहे. गावातील अनेक तरुणांनी पारंपरिक शेतीला फाटा देत स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधण्यास सुरुवात केली होती. मात्र, यावर्षी निसर्गाने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची परीक्षा घेतली आहे. अतिवृष्टीमुळे स्ट्रॉबेरीची लागवड उशिरा झाली, त्यातच हंगाम लांबणीवर पडल्याने बाजारपेठेत अपेक्षित दरही मिळेनासे झाले आहेत. अशा दुहेरी संकटात असतानाच आता रानटी जनावरांच्या त्रासाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
काल रात्री रानडुकरांच्या एका मोठ्या कळपाने राजकुमार महाडिक आणि अक्षय रांजणे यांच्या शेतात शिरून पिकाची मोठी नासधूस केली. काढणीला आलेली फळे फस्त करण्यासोबतच डुकरांनी रोपेही उखडून टाकली आहेत. या नुकसानीमुळे हे दोन्ही शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. वनविभागाने या रानटी जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
या संदर्भात संताप व्यक्त करताना राजकुमार महाडिक म्हणाले की, “लाखो रुपये कर्ज काढून आणि अतोनात कष्ट करून आम्ही हे पीक उभे केले होते. मात्र रानडुकरांनी सर्व काही संपवले आहे. जर वनविभागाने या नुकसानीची दखल घेतली नाही आणि आम्हाला न्याय दिला नाही, तर मला आत्मदहन करावे लागेल.”
झटका मशीन देण्याची मागणी
रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. शासनाने एकतर या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मुभा शेतकऱ्यांना द्यावी किंवा शेतीचे संरक्षण करण्यासाठी वनविभागामार्फत ‘झटका मशीन’चा पुरवठा करावा, जेणेकरून भविष्यातील नुकसान टाळता येईल, अशी मागणी घोटेघरमधील ग्रामस्थांनी केली आहे.
























