पाचगणी न्यूज नेटवर्क
तापोळा : सोनाट (तालुका महाबळेश्वर ) येथील ग्रामस्थ राघू जानू कदम या शेतकऱ्याचा गव्याच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात ऐन दिवाळीत शोककळा पसरली आहे.
राघू कदम हे सकाळी शेतीची कामे करण्यासाठी शेतात गेले होते. दुपार नंतर गावातील अन्य लोक शेतात जात असताना राघू कदम धारातीर्थी पडलेले काही लोकांना दिसले. हल्ला इतका जबरदस्त होता की गव्याचे शिंग राघू यांच्या छाती फाडून निघाले होते. हल्ला चढवून जोरदार धडक दिल्याने राघू कदम हे जागीच ठार झाले.
या विभागात रान गाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतीचे नुकसान करत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी यांनी शेती करणे सोडून दिले आहे. आजच्या घटनेमुळे गावातील तसेच विभागातील शेतकरी यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गव्याचा हल्ला एवढा प्रचंड होता हो राघू कदम यांच्या शरीराच्या चिधड्या झाल्या आहेत. ही दुःखद घटना समजताच विभागातील लोकांचा जनसमुदाय घटनास्थळी जमा झाला. रानगवे, रान डुक्कर यांच्या त्रासामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. या घटनेमुळे लोकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
घटना स्थळी फॉरेस्ट अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित झाले. मयताचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी पुढील कार्यवाही सुरु आहे.
























