पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : पाचगणीच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सलग १५ वर्षे पाचगणी नगरपालिकेवर एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर यांनी अखेर आपल्या समर्थक नगरसेवकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सातारा येथील साहित्य संमेलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिह्यातील भाजपच्या सर्व नगरसेवक व नगराध्यक्षांचा सरकार सोहळा पार पडला. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उपस्थिती होती.
गेल्या १५ वर्षांपासून पाचगणीत कराडकर गटाची निर्विवाद सत्ता होती. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारत कराडकर यांच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. राष्ट्रवादीच्या या धक्क्यामुळे कराडकर यांना प्रथमच सत्तेपासून दूर व्हावे लागले. सत्तेची समीकरणे बदलल्याने आणि आगामी काळात शहरात आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी कराडकर यांनी आता भाजपची साथ घेण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपचे ‘कमळ’ हाती घेणारे पाच शिलेदार
यावेळी केवळ लक्ष्मी कराडकरच नव्हे, तर त्यांच्यासोबत पाच नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यात स्वतः लक्ष्मी कराडकर (माजी नगराध्यक्षा), वैभव कराडकर, प्रसाद कारंजकर,विनोद बिरामणे, अभिलाषा कराडकर यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीकडे सत्ता गेल्यापासून कराडकर गट काहीसा बॅकफूटवर होता. मात्र, आता थेट सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शहरात भाजप एक ‘सक्षम विरोधक’ म्हणून उभा ठाकला आहे. लक्ष्मी कराडकर यांचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आणि पाच नगरसेवकांची साथ यामुळे नगरपालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीला आता भाजपच्या आक्रमक विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
या घडामोडीमुळे पाचगणीतील राजकारण आता अधिक चुरशीचे झाले असून, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा नवा संघर्ष येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे.
























