पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : हवेच्या निवांतपणासाठी आणि निसर्गसौंदर्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या पाचगणी शहरात सध्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील मुख्य पर्यटन केंद्र असलेल्या टेबल लँडकडे जाणाऱ्या मार्गावर, सर्कल ऑफिस कार्यालयासमोरच रस्त्यावरील गटाराची लोखंडी जाळी अत्यंत धोकादायक स्थितीत आली आहे. ही जाळी कोणत्याही क्षणी तुटण्याच्या अवस्थेत असून, त्यावरून दररोज शेकडो वाहने आणि पर्यटकांची ये-जा सुरू असते. प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पाचगणीत येणारा प्रत्येक पर्यटक टेबल लँडला भेट दिल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. सर्कल ऑफिससमोर असलेल्या या गटारावरील जाळीचे लोखंड सडून कमकुवत झाले असून ती पूर्णपणे दबली गेली आहे. अवजड वाहने या जाळीवरून जाताना मोठा आवाज होतो आणि जाळी अधिकच खचत चालली आहे. जर धावत्या वाहनाखाली ही जाळी अचानक तुटली, तर वाहनाचा टायर त्यात फसून भीषण अपघात होऊ शकतो. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती जीवघेणी ठरू शकते, कारण रात्रीच्या वेळी किंवा पावसाच्या अंधारात ही तुटलेली जाळी लक्षात येत नाही.
केवळ वाहनेच नव्हे, तर या मार्गावरून मोठ्या प्रमाणात पादचारी आणि पर्यटक चालत असतात. अनेकदा लहान मुले खेळत असताना किंवा पर्यटक निसर्ग पाहत चालताना या जाळीवरून जातात. ही जाळी तुटून एखादा पादचारी त्यात पडल्यास गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांनी वारंवार याकडे लक्ष वेधूनही अद्याप पालिकेने याची दखल घेतलेली नाही. “प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
पर्यटन हंगाम सुरू असल्याने पाचगणीत गर्दी वाढत आहे. अशा स्थितीत सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून ही धोकादायक जाळी तशीच ठेवणे पर्यटनाच्या दृष्टीने घातक ठरू शकते. पालिकेने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता, ही धोकादायक जाळी तातडीने बदलून त्या ठिकाणी मजबूत नवीन जाळी बसवावी किंवा कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, येथे होणाऱ्या कोणत्याही अपघाताला नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा पर्यटक व स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
























