पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : “निवडणुका जवळ आल्या की काही लोक समाजात लुडबुड करताना दिसतात. अशा प्रवृत्तींना कदापिही थारा देऊ नका. आदरणीय मकरंद आबांनी तालुक्याला कोट्यवधींचा निधी दिला आहे, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मतांच्या माध्यमातून त्यांना भरभरून परतफेड करण्याची वेळ आली आहे. आपण केवळ विकासाच्या जोरावर निवडणुका लढणार असून, तालुक्यातील सर्व सहाच्या सहा जागा जिंकण्यासाठी सर्वांनी एकदिलाने पाठीशी राहावे,” असे आवाहन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी केले.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या फंडातून भोसे गावासाठी मंजूर झालेल्या १ कोटी १० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ राजपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण भिलारे, दांडेघरचे माजी सरपंच शंकरराव कळंबे, पांगारीचे सरपंच संदीप पांगारे, महेंद्र पांगारे, जानू पांगारे, सुरेंद्र भिलारे, ग्रामसेवक मोनिका बाबर, पोलीस पाटील रूपाली गोळे, दिलीप गोळे, सविता गोळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील संधींबाबत भाष्य करताना राजपुरे पुढे म्हणाले की, “महाबळेश्वर तालुक्यात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. स्थानिकांनी आपल्या जमिनी विकण्याची घाई करू नये. स्वतःच्या जागेत पर्यटनपूरक व्यवसाय उभारून आपली आर्थिक उन्नती साधावी. मकरंद आबांच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त निधी देण्यासाठी कटिबद्ध आहोत, त्यामुळे आपल्या मालकीच्या जमिनी आपल्याच ताब्यात ठेवाव्यात.”
यावेळी बोलताना प्रवीणशेठ भिलारे म्हणाले की, महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामस्थांना विकासकामे मागावी लागत नाहीत, ती आपोआप मिळतात. दिवंगत बाळासाहेब भिलारे यांच्या दूरदृष्टीचा विचार आज राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या कामात दिसून येतो. मकरंद आबांच्या माध्यमातून राजूशेठ प्रत्येक गावाची गरज ओळखून न मागता निधी देत आहेत, हे तालुक्याचे भाग्य आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपसरपंच अरुण गोळे यांनी प्रास्ताविकातून गावच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला आणि ते सोडवण्यासाठी राजपुरे यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली. गणेश गोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर राम गोळे यांनी आभार मानले.
























