पांचगणी न्यूज नेटवर्क
तळदेव : महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम कांदाटी, सोळशी, कोयना विभागात वीज वितरण , मोबाईल रेंज, रस्ते, दळणवळण आणि आरोग्याच्या सेवेचा बोजवारा उडाला आहे. विकासाचा कितीही डांगोरा पिटला तरी या समस्या येथील जनतेच्या पाचवीला पुजल्या आहेत. आज मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांना याचा जाब विचारत तातडीने सूचनांची कार्यवाही न झाल्यास कारवाईला सामोरे जा असा सज्जड इशारा मंत्रीमहोदयांनी यावेळी दिला आहे.
तळदेव तालुका महाबळेश्वर येथील ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक घेतली. तसेच या दरम्यान नागरिकांच्या विविध समस्या आणि अडचणी त्यांनी समजून घेतल्या व तत्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. येथील ग्रामस्थानी यावेळी तक्रारींचा मंत्रीमहोदयांसमोर पाढाच वाचला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, माजी सभापती संजूबाबा गायकवाड, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुराव संकपाळ , नियोजन कमिटी सदस्य प्रवीण भिलारे, वसंत शिंदे, घनश्याम संकपाळ आदी यावेळी उपस्थित होते.
पाऊस आला की वीज जाते, वीज गेल्यावर चार चार पाच पाच दिवस येत नाही. वायरमन दुर्लक्ष करतात. यावर नागरिकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. यावर अधिकाऱ्यांनी मात्र वीज बंद होण्याची कारणे वृक्ष असून वनविभाग अडसर होणाऱ्या फांद्या सुद्धा तोडून देत नाहीत अशी पुष्टी दिली. राजेंद्र राजपुरे म्हणाले अख्या महाराष्ट्राला कोयनेने वीज दिली आणि तीच विभाग जर विजेसाठी धडपडत असेल तरच हे दुर्दैव म्हणावे लागेल. अधिकारीं फक्त पगार घेण्याचे काम करताहेत असे सांगितले यावर आपण आता अडचणीची पांचगणी महाबळेश्वर लाईन अंडरग्राऊंड केली आहे. आता तुमच्या भागातसुधा करू पण यापुढे अधिकाऱ्यांची कसलीही गय केली जाणार नाही याची दखल घ्यावी असे मंत्री ना. पाटील यांनी अभियंत्यांना दम भरला.
मोबाईल टॉवर बाबतही अधिकाऱ्यांवर नागरिक अक्षरश तुटून पडले. वीज गेल्यावर रेंज जाणे, आठ आठ दिवस टॉवर बंद असल्याने रेंज न मिळणे या कारणाने नागरिक त्रस्त असून याबाबत तुटपुंजी कर्मचारी संख्या आणि आधुनिक यंत्रणा नसल्याने हे प्रॉब्लेम वारंवार येत आहे. यावेळी ही रोजचीच बोंबाबोंब असल्याचे नागरिकांनी सांगितले यावर अधिकारी यांना जग बदलत असताना तुम्ही स्वताच्या कर्तव्यदक्षतेअभावी या जनतेची होरपळ करीत आहात. लवकर सुधारणा करा , कामे करा, लोकांच्या समस्या सोडवा नाहीतर त्यात मला निर्णय घ्यावा लागेल याची दक्षता घ्या असे सांगितले.
रस्ते कामाबाबत चाललेली कामे ही ठेकेदारांनी वेळेवर सुरू मी केल्याने पावसात सापडत आहेत. त्यामुळे लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आपली कामे तातडीने पूर्ण करावीत व दर्जेदार करावीत यापुढे कसलीही तक्रार येता कामा नये याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी असा मकरंद आबा पाटील यांनी सांगितले.
गणेश भोसले, विठ्ठल धनावडे, धोंडीबाशेठ धनावडे, रमेश धनावडे, तुकाराम धनावडे यांनी विविध समस्या मांडल्या. यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती.
दरम्यान नागरिकांच्या विविध समस्या आणि अडचणी त्यांनी समजून घेतल्या व तत्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
























