भाजपच्या कुटील राजकारणाने ‘यशवंत विचारां’ची पायमल्ली; ऋतुजा शिंदेंविरोधात रणशिंग फुंकले!
वाई (अजित जगताप ):सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणात सध्या ‘आयाराम-गयाराम’ आणि फोडाफोडीच्या राजकारणाने कळस गाठला आहे. बावधन जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ चिन्हावर निवडून आल्यानंतर, भाजपच्या मदतीने महिला व बालकल्याण सभापती पद मिळवणाऱ्या सौ. ऋतुजा विराज शिंदे यांच्याविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. या “गद्दारी”चा निषेध करण्यासाठी सोमवार, ६ एप्रिल रोजी वाई येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपच्या सत्तेसाठी प्रशासनाचा बळी?
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत पोलीस आणि भाजपच्या युतीने राष्ट्रवादी-शिवसेनेला रोखल्याचा आरोप आधीच झाला आहे. दोन सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना मतदानापासून वंचित ठेवल्याने भाजपला सत्ता मिळाली असली तरी, त्यांची नैतिक प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच जिल्हा परिषदेचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. हे भाजपच्या राजकीय कटकारस्थानाला प्रशासकीय साथ लाभल्याचेच लक्षण असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
‘नथीतून तीर’ आणि विचारधारेची तिलांजली
महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्याला भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाने गालबोट लावले आहे. खटावमधील सौ. लता कर्णे आणि वाईतील सौ. ऋतुजा शिंदे यांना सभापती पदे देऊन भाजपने राष्ट्रवादीत फूट पाडल्याची टीका होत आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, “ज्या ऋतुजा शिंदेंसाठी ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील आणि कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले, त्यांनीच आता भाजपच्या वळचणीला जाऊन मतदारांशी विश्वासघात केला आहे.”
गद्दारीची ‘नाळ’ कुठे जुळली?
राजकीय विश्लेषकांच्या मते, या गद्दारीमागे जुनी राजकीय समीकरणे आहेत. भाजप नेते ना. जयकुमार गोरे आणि विराज शिंदे यांचे जुने संबंध याला कारणीभूत असल्याचे बोलले जाते. विराज शिंदेंचे सासरे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना ना. गोरे देखील काँग्रेसमध्ये होते. हीच ‘काँग्रेस-कनेक्शन’ची नाळ आता गद्दारीच्या रूपाने समोर आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
वाईत सोमवारी ठिणगी पडणार!
सभापती निवडीनंतर वाईत स्वागताचे नव्हे, तर संतापाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीने पुकारलेल्या या मोर्चासाठी सोशल मीडियावर व्हिडिओ क्लिप्स आणि पोस्टर्सचा पाऊस पडत आहे. ऐन उन्हाळ्यात वाईचे राजकीय वातावरण या मोर्चामुळे पूर्णपणे तापले असून, जनता या विश्वासघाताला कसे उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
























