कास : सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा, घनदाट जंगल आणि निसर्गाचे अद्भूत लेणे लाभलेल्या स्वयंभू नागेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शंभूभक्तांचा अक्षरशः महासागर उसळला होता. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर, वासोटा किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या या प्राचीन देवस्थानाचा परिसर शुक्रवारी ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. कठीण डोंगरवाट आणि अथांग जलप्रवास करत हजारो भाविकांनी नागेश्वराच्या चरणी माथा टेकवला.
पहाटेच्या गारव्यातच बामणोली, शेंबडी आणि मुनावळे या घाटांवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कोयना नदीवरील छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातून (शिवसागर) शेकडो बोटींच्या माध्यमातून भाविक नागेश्वराच्या डोंगराकडे रवाना होत होते. सुमारे दीड तासांचा हा नयनरम्य जलप्रवास आणि त्यानंतर घनदाट झाडीतून केलेली चढाई भाविकांच्या उत्साहात अधिकच भर टाकत होती.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात, एका प्रचंड सुळक्याच्या पोटात वसलेले हे स्वयंभू शिवलिंग भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्रीनिमित्त येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या दुर्गम भागात निसर्गसौंदर्य आणि अध्यात्माचा अनोखा संगम पाहायला मिळतो. यंदाही सातारा जिल्ह्यासह संपूर्ण कोकण पट्ट्यातून शिवभक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
हा संपूर्ण परिसर व्याघ्र प्रकल्पाच्या ‘कोअर झोन’मध्ये येत असल्याने वन्यजीव संरक्षण आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने कंबर कसली होती. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालय, बामणोली व कांदाटी यांच्या वतीने विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे, यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना वन विभागाने विनामूल्य परवानगी दिली होती. दोन दिवस संपूर्ण जंगल वाटेवर वन कर्मचाऱ्यांची गस्त सुरू होती, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये.
कठिण चढण असूनही अबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत होता. “निसर्गाच्या सान्निध्यातील हा प्रवास आणि त्यानंतरचे नागेश्वराचे दर्शन मनाला एक वेगळीच शांतता देऊन जाते,” अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या. शिस्तबद्ध नियोजन आणि प्रशासकीय सहकार्यामुळे यंदाची यात्रा अत्यंत उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडली. सायंकाळपर्यंत कोयना खोऱ्यात भक्तीचा हा जागर सुरूच होता.
























