पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : किल्ले प्रतापगडाच्या छायेत वसलेल्या गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केवळ पारंपरिक पद्धतीने साजरी न करता, एका सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचा वारसा जपत साजरी करण्यात आली. येथील ‘सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे कला क्रीडा मंडळा’ने यावर्षीपासून “सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे शिष्यवृत्ती योजना-2026” हा अत्यंत स्तुत्य आणि दूरदर्शी उपक्रम सुरू केला आहे. या अभिनव उपक्रमामुळे शिवजयंती साजरी करण्याचा एक नवा आदर्श या तरुण मंडळाने समाजासमोर ठेवला आहे.
या योजनेअंतर्गत गावातील जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षाचा विडा मंडळाने उचलला आहे. यंदाच्या पहिल्या वर्षी ५० विद्यार्थ्यांमधून कुमारी ईश्वरी प्रवीण मालुसरे या विद्यार्थिनीची या मानाच्या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली. शिवजयंतीच्या पवित्र मुहूर्तावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारक स्थानी ईश्वरीला मान्यवरांच्या हस्ते लॅपटॉप आणि रणजित देसाई लिखित ‘श्रीमान योगी’ ही अजरामर कादंबरी देऊन सन्मानित करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञान आणि थोर इतिहासाची मूल्ये यांची सांगड घालणारा हा गौरव सोहळा उपस्थित सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश मालुसरे, दीपक मालुसरे आणि तेजस मालुसरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “आजच्या युगात शिक्षणाशिवाय प्रगती नाही. सुभेदारांच्या पराक्रमाचा वारसा सांगणाऱ्या या भूमीतील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याच भावनेतून आम्ही ही योजना सुरू केली आहे. ही शिष्यवृत्ती आता दरवर्षी सातत्याने राबवण्यात येईल.”
शिवजयंतीनिमित्त केवळ हाच उपक्रम नव्हे, तर गावात सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी, महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ आणि विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांनाही भरघोस बक्षिसांनी गौरवण्यात आले.
मंडळाच्या या विधायक कार्याचे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे आणि खिंगर केंद्राचे केंद्रप्रमुख संजय पारठे यांनी विशेष कौतुक करून याला ‘आधुनिक काळातील मावळ्यांचा उपक्रम’ असे संबोधले. शाळेचे शिक्षक सूर्यकांत शिंदे, मनोहर गायकवाड आणि सौ. वैशाली पाटील यांनी तरुण मंडळाचे आभार मानले.
गोडवलीकरांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सध्या संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात आणि सातारा जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू असून, इतर मंडळांसाठी हा एक दीपस्तंभ ठरला आहे.
























