पांचगणी न्यूज नेटवर्क/ प्रमोद रांजणे
पाचगणी : शिक्षण क्षेत्रात आपल्या कल्पक अध्यापनाने आणि समर्पित वृत्तीने वेगळी ओळख निर्माण करणारे पाचगणी येथील सेंट झेवियर्स हायस्कूलचे शिक्षक शिवाजी जाधव यांना यावर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५-२६’ प्रदान करण्यात आला.
- ध्येय फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय उपक्रमात जाधव सरांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करण्यात आला असून, या यशामुळे संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याचे नाव राज्यस्तरावर उंचावले आहे.
पुणे येथील निगडी परिसरातील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात ‘एज्युकेशन आयकॉन्स समिट – २०२६’ हा सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. रविवार, २९ मार्च रोजी संपन्न झालेल्या या भव्य कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रेय वारे गुरुजी यांच्या शुभहस्ते जाधव सरांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र आणि शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यातून केवळ एका शिक्षकाची निवड करण्याच्या कडक प्रक्रियेतून, जाधव सरांनी आपल्या उत्कृष्ट अध्यापन कौशल्याच्या जोरावर या मानाच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे.
शिवाजी जाधव सर हे हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांचे तज्ज्ञ मानले जातात. भाषेसारखा विषय केवळ पुस्तकी न ठेवता तो रंजक आणि अनुभवाधिष्ठित पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी राबवलेले वाचन प्रेरणा अभियान, साहित्यिक कार्यशाळा आणि वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्ये विकसित झाली आहेत. केवळ वर्गापुरते मर्यादित न राहता त्यांनी ‘शिकत-करत’ या संकल्पनेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि आत्मविश्वास निर्माण केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले विद्यार्थी आज तालुका आणि जिल्हा स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवत आहेत. शैक्षणिक कार्यासोबतच त्यांनी पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जनजागृती मोहिमांमध्येही सक्रिय सहभाग नोंदवून समाजात एक आदर्श शिक्षक कसा असावा, याचा वस्तुपाठ घालून दिला आहे.
या बहुमानाबद्दल सेंट झेवियर्स हायस्कूलचे संस्थापक फादर टॉमी, प्राचार्य फादर साबू आणि सर्व शिक्षक सहकाऱ्यांनी जाधव सरांचे भरभरून कौतुक केले आहे. जाधव सरांची मेहनत, विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा आणि नवनवीन प्रयोग करण्याची जिद्द ही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सध्या पाचगणी, महाबळेश्वर आणि सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळातून जाधव सरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या गौरवामुळे स्थानिक शिक्षण क्षेत्राची मान अभिमानाने उंचावली आहे.
























