पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : मौजे आंब्रळ (ता. महाबळेश्वर) येथे मागील आठ दिवसांपासून अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने आणि भव्य ग्रामदिंडीने मोठ्या थाटात सांगता झाली. या सप्ताहानिमित्त दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, हरिपाठ आणि रात्री ज्येष्ठ कीर्तनकारांच्या सुश्राव्य कीर्तनासह भजनांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थ मंडळ आंब्रळ, स्थानिक भजनी मंडळ आणि श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या विशेष सहकार्यातून हा अध्यात्मिक सोहळा यशस्वीरित्या पार पडला.
ह.भ.प. श्री रवींद्र महाराज आंब्राळे यांनी या सोहळ्याचे नेटके नियोजन केले, तर विणेकरी म्हणून गुलाब आंब्राळे आणि चोपदार म्हणून अनिल विठ्ठल आंब्राळे यांनी आपली सेवा समर्पित केली.
सप्ताहाच्या काळात ह.भ.प. श्रीपाद महाराज जाधव (सातारा), ह.भ.प. स्वप्नील महाराज गायकवाड, ह.भ.प. ऋषिकेश महाराज दरेकर, ह.भ.प. संतोष महाराज बर्गे, ह.भ.प. मधुसूदन महाराज महिपाल आणि ह.भ.प. श्री भरत महाराज मिस्त्री अशा दिग्गज कीर्तनकारांच्या वाणीतून श्रोत्यांना ज्ञानरूपी अमृत मिळाले. सप्ताहाची सांगता ह.भ.प. ज्योतीताई मतकर (अध्यक्ष, वारकरी शिक्षण संस्था आळंदी) यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेला दिपोत्सव ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावातून निघालेल्या पालखी सोहळ्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. हातात टाळ-मृदंग आणि मुखी हरिनामाचा गजर करत निघालेल्या या दिंडीत महिला आणि माहेरवाशिणींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन भक्तिभावाने फेर धरला. कुंभळजाई मंदिरात महिलांचे टाळ पथक आणि फुगड्यांच्या कार्यक्रमाने संपूर्ण गाव भक्तिमय झाले होते.
या सांगता समारंभास सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी अध्यात्माचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. राजपुरे म्हणाले की, वारकरी संप्रदाय ही आपली खरी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संपत्ती आहे. अशा सामूहिक उपक्रमांमुळे गावात केवळ धार्मिक वातावरण निर्माण होत नाही, तर सामाजिक एकोपा आणि एकीची भावना अधिक दृढ होते. ज्याप्रमाणे पांडुरंगाच्या चरणी सर्व भक्त समान असतात, त्याचप्रमाणे भक्तीच्या माध्यमातून माणसे जोडण्याचे काम हे सप्ताह करत असतात. शेवटी विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उपस्थितीने वातावरणात एक वेगळीच चैतन्यशक्ती भरली. कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप होऊन या मंगलमय सोहळ्याची सांगता करण्यात आली.
























