पाचगणी न्यूज नेटवर्क /प्रमोद रांजणे
पाचगणी : महात्मा गांधीजी यांच्या व कस्तुरबा गांधी यांच्या वास्तव्याच्या ठिकाणांची स्वच्छता करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती पांचगणी येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
महात्मा गांधी स्मारक समिती, हीलदारी संस्था आणि सह्याद्री पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी असणाऱ्या कस्तुरबा गांधी वास्तू परिसर, महात्मा गांधी पदपथ आणि रुग्णालय परिसरातील कचरा गोळा करून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत हिलदारी सदस्य, गांधी स्मारक समिती , हिल रेंज हायस्कूल विद्यार्थी आणि सह्याद्री पत्रकार संघाचे सदस्य सहभागी झाले होते.
त्यानंतर नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गांधी विचारांबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी अस्लम तडसरकर, रविकांत बेलोशे , महेंद्र पांगारे, दिलीप पाडळे , जयदीप शिंदे, राजेंद्र भंडारी , मुख्याध्यापक लक्ष्मण हिरवे, सत्यवान रांजणे, हिलदारीचे डॉ. मुकेश कुलकर्णी व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अस्लम तडसरकर म्हणाले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण मानवजातीसाठी दिलेला सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश सर्वांना कायम प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारानेच देशाने आणि जगाने पुढे जायला हवे. देशातील सध्याच्या स्थितीमध्ये त्यांच्या विचारांची जास्त गरज असल्याचे सांगितले.
चौकट: पाचगणी येथील गांधीजींच्या वास्तव्याच्या स्मृतीखुणा जपून ठेवणे आणि येथील येणाऱ्या पर्यटकांना याबाबतची माहिती मिळावी यासाठी या परिसरात गांधीजींचा स्मृतीस्तंभ उभा रहावा अशी मागणी यावेळी पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेकडे महात्मा गांधी स्मारक समितीने ऐका निवेदनाद्वारे केली.
























