पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना आनंददायी, तणावमुक्त शिक्षण मिळावे या उद्देशाने खिंगर केंद्राचा ‘बाल आनंद मेळावा’ पाचगणी येथील नगरपालिका शाळा क्रमांक १ मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याला सातारा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रवीण शेठ भिलारे, महाबळेश्वर पंचायत समितीच्या माजी सभापती शकुंतला चोरमले, ज्येष्ठ नेते रमेश चोरमले, पंचायत समिती सदस्या वंदना भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुरेंद्र भिलारे, माजी मुख्याध्यापक सुनील भिलारे आणि खिंगर केंद्राचे केंद्रप्रमुख संजय पार्टे हे उपस्थित होते . या मेळाव्यामध्ये खिंगर केंद्रांतर्गत येणाऱ्या विविध जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी बोलताना राजेंद्र शेठ राजपुरे यांनी स्पष्ट केले की, बाल आनंद मेळावा हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील भीती नष्ट होऊन ते अधिक आत्मविश्वासाने आपली कला सादर करू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दिवसभर चाललेल्या या मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम, आकर्षक रांगोळी स्पर्धा आणि विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या चिमुकल्या हातांनी रेखाटलेल्या रांगोळ्या आणि रंगमंचावर सादर केलेल्या कलाविष्कारांनी उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. स्पर्धेमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना आणि सहभागी झालेल्या शाळांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुरेंद्र भिलारे आणि रमेश शेठ चोरमले यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शिक्षणासोबतच अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख संजय पार्टे यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी केंद्राच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. राजपुरी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद चोरट यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षक, पदवीधर शिक्षक आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. भारावलेल्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात या बाल आनंद मेळाव्याची सांगता झाली.
या आंनद मेळाव्यातून विद्यार्थाना तणावमुक्त शिक्षण मिळत असते. राजेंद्र शेठ राजपुरे यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘आनंददायी आणि तणावमुक्त’ वातावरण मिळाल्यास मुलांची शिकण्याची ओढ वाढते. अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांसाठी असे मेळावे म्हणजे एक प्रकारचा ‘रिफ्रेशमेंट’ असतात. अशा भावना यावेळी सभापती शकुंतला चोरमले यांनी व्यक्त केल्या.
























