पांचगणी न्यूज नेटवर्क/अजित जगताप
बावधन:बावधन गटातील राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांनी चांगलेच तापले असून, सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेला नूतन महिला व बालकल्याण सभापती सौ. ऋतुजा विराज शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “माझी निष्ठा राष्ट्रवादीशीच असून मतदारांशी किंवा पक्षाशी प्रतारणा करणे माझ्या रक्तात नाही. गद्दारीचे आरोप करणाऱ्यांनी आधी वस्तुस्थिती तपासावी,” अशा ठाम शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर निवड
सभापती निवडीनंतर सौ. शिंदे भाजपला मिळाल्याच्या चर्चांना पूर्णविराम देताना त्या म्हणाल्या की, “आमदार मकरंद आबा पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला संधी मिळाली. माझ्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून राष्ट्रवादीच्याच सदस्याने स्वाक्षरी केली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सभापती निवडीत मी भाजपला मतदान केलेले नाही. माझी ही निवड बिनविरोध झाली असून हे पद राष्ट्रवादीचेच आहे. त्यामुळे गद्दारीचा प्रश्नच उद्भवत नाही.”
‘असूयेपोटी बदनामीचा कट’ – विराज शिंदे
या वादावर विराज शिंदे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले की, “आम्हाला मिळालेले यश काही संधीसाधूंना पचनी पडत नाहीये. सत्तेत असो वा नसो, लोकांच्या कामासाठी आम्ही नेहमीच आघाडीवर राहिलो, त्यामुळेच अनेकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. जिल्हा परिषद निवडीच्या निमित्ताने काही लोक आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असून, दुसऱ्याच्या नथीतून तीर मारण्याचे कुटील डाव आखले जात आहेत.”
विकासाचा रथ थांबणार नाही!
सत्ताधारी गटाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने आणि राष्ट्रवादीकडून एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली. ही निवड केवळ बावधन गटासाठीच नव्हे तर संपूर्ण वाई मतदारसंघासाठी अभिमानास्पद असल्याचे विराज शिंदे यांनी नमूद केले. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी विरोधकांना इशारा देताना सौ. ऋतुजा शिंदे म्हणाल्या, “कुणी कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी सूर्याचे अस्तित्व संपत नाही. आम्ही विकासाचा वसा घेतला आहे आणि विरोधकांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करून जनतेच्या आशीर्वादाने बावधनचा विकास रथ असाच गतिमान ठेवणार आहोत.”
























